ढाणकी : ढाणकीत आज प्रलंबित असलेले घरकुल आणि नेहमीच्याच पाणीप्रश्नासाठी ढाणकीकर यांच्या वतीने महा आक्रोश मोर्चा नगरपंचायत कार्यालयावर काढण्यात आला होता. आठवडी बाजारातून निघालेल्या या मोर्च्याची सांगता नगरपंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी पाईकराव यांना निवेदन देऊन करण्यात आली. यामध्ये महा विकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला.
ढाणकी नगरपंचायत झाल्यापासून घरकुल योजना धूळ खात असे. शहरातील अजूनही गरिबांना आपल्या हक्काचे घर नाही. पाण्याचा प्रश्न तर ढाणकी च्या पाचवीलाच पुजलेला आहे. शहरातील सार्वजनिक विहीर, तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गांजेगाव येथील पैनगंगा नदीला मुबलक पाणी असताना नगरपंचायतच्या नाकर्तेपणामुळे पाण्याची झळ सोसावी लागत आहे. आजच्या स्थितीला 10 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला.
त्याचप्रमाणे घरकुलाचे सुद्धा झाले असून नगरपंचायत होऊन अंदाजे अडीच वर्ष होत असतानाही घरकुलाचा प्रश्न कोणत्या लालफितीत अडकला हेच नागरिकांना कळायला मार्ग नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आज महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये नगरपंचायतला धडक दिली. नागरिकांचा हा रुद्रावतार पाहून नगरपंचायत प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. सध्या ढाणकी येथील मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने प्रभारी मुख्याधिकारी म्हणून उमरखेडचे नायब तहसीलदार पाईकराव यांनी नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले व 15 दिवसाच्या आत पाणी समस्या निकाली काढू असे लेखी. आश्वासन दिले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात देण्यात आलेल्या सभेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्र पाटील यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर जोरदार हल्लाबोल करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच नगर उपाध्यक्ष शेख जहीर शेख मोला, शेख खाजा शेख पक्रू, शिवसेना शहर प्रमुख बंटी जाधव, गणेश नरवाडे, प्रशांत जोशी, कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख सुनिता घोडे, रामराव गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे यांनी या धरणे आंदोलनात सूत्रसंचालन केले, तरी इतर नेत्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर नागरिकांचा प्रचंड मोर्चा सोबत घेत नगरपंचायत कार्यालयात धडक देत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल तुपेकर, युवा सेना प्रमुख संभाजी गोरटकर, नगरसेवक संभावती गायकवाड, शेख इरफान, बाबुराव नरवाडे, प्रवीण जैन, एजास पटेल, रमेश गायकवाड, सौ ज्योती उमराव चंद्रे, नूरजहाँ बेगम शेख हुसेन, शेख अहेमद, ओमाराव चंद्रे, रमेश पराते, शेख बशीर, स्वप्नील पराते, शेख माजिद, व गावातील महिला व नागरिक, उपस्थित होते.
गाणेगाव येथील पैनगंगा नदीला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहराची तहान सुद्धा भागू शकते परंतु पाणी फिल्टर च्या दुरुस्ती अभावी नदीचे पाणी शहराला मिळत नाही आहे. फिल्टर नगरपंचायतीच्या स्थापनेपासून शहराला पाणीपुरवठा करणारी पाणी फिल्टर बंद आहे. 2 विहिरींचे पाणी अदान प्रधान करणारी पाईपलाईन ग्रामपंचायत ने नगरपंचायतला देऊनही नगरपंचायत प्रशासन या कामात हलगर्जीपणा करत असल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा असल्याचा आरोप यावेळी काही नागरिकांनी बोलून दाखवला.