शहापूर तालुका कृषि विभाग यांच्या माध्यमातून खरीप हंगाम पुर्व तयारी कार्यक्रमाचे आयोजन
शहापूर : मौजे भावसे (बिबीचा पाडा), साक्रोली, नेवरे येथे तालुका कृषि विभाग शहापूर मार्फत खरीप हंगाम पुर्व तयारी करतांना मंडळ कृषि अधिकारी खर्डी रवींद्र घुडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाणे निवड करतांना घ्यावयाची काळजी त्यात बियाणे निवडतांना मान्यताप्राप्त व योग्य प्रकारचेच खरेदी करावे. बियाणाच्या पिशवीवर लेबल व सील असावे. लेबलवर संबंधित अधिकाऱ्याची सही असावी. खरेदीची पावती घ्यावी. लेबलवर बियाणाची जात, प्रकार, लॉट नंबर, उगवण शक्ती, आनुवंशिक शुद्धता, बियाणे वापराचा अंतिम दिनांक याचा उल्लेख असेल, याची खात्री करावी. कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विवीध योजनांची माहीती दिली त्यात प्रामुख्याने मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, मोगरा व सोनचाफा लागवड, हळद लागवड, MAHA – DBT योजनेतुन कृषि औजारे त्यात ट्रँक्टर, रोटँव्हेटर, पॉवरटिलर, ग्रास विडर, पँडी प्लान्टर, ईलेक्ट्रिक मोटार, फवारणी यंत्र बाबत माहीती दिली, PFEME योजनेतुन अन्नप्रक्रियेवर आधारित लघुउद्योग कसे उभारता येईल त्याबाबत मार्गदर्शन केले.
कृषि पर्यवेक्षक खर्डी lअशोक सिनकर यांनी भात बियाण्यावर बीजप्रक्रिया कशी करावी वजनाने जड व उत्कृष्ट बियाणे च वापरावे वरील प्रक्रियेनंतर एक किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम या प्रमाणात चोळून पेरणी करावी. यामुळे करपा, कडाकरपा, पर्ण, तपकिरी ठिपके, उदबत्ता आणि आभासमय काजळी या रोगावर नियंत्रण मिळवता येते. यासोबतच बियाण्यावर २५० ग्रॅम जीवाणू संवर्धनाचे पाकीट १० किलो बियाण्यास वापरावे. एक लिटर गरम पाण्यात शंभर ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे. हे द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये पाव किलो जीवाणू संवर्धन टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे. नंतर बियाणे सावलीत सुकवावे व या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी. जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर करावी व घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासतांना एका ओल्या गोणपाटावर 100 बियाणे ओळी ओळीने रांगेत विशिष्ठ आंतरावर ठेवावे व त्यावर सकाळ संध्याकाळ पाणी शिंपडावे. पाच ते सहा दिवसांनी किती बियाण्यांना मोड येते त्यावरून बियाण्याची उगवण क्षमतेची टक्केवारी काढावी शक्यतो 80 % वरिल बीयाण्याची निवड करावी, याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपस्थित शेतकऱ्यांना करून दाखवले. शेतकऱ्यांना शेतीशाळा राबवतांना काय काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. भात पिक लागवड तंत्रज्ञानांची माहीती दिली त्यात चारसुत्री भात लागवड, श्री पद्धत, पेरभात, ड्रमसिडर, यंत्राद्वारे भात लागवड व पट्टा पद्धतीचे महत्व समजावुन सांगीतले.
भावसे गावातील प्रयोगशिल शेतकरी देवराम कृष्णा भोये यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शनखाली मागील वर्षी पेरभात व पट्टा पद्धतीने भात लागवड केली त्यातुन त्यांनी कसे उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ केली याबाबत अनुभव सांगीतले. कृषि सहाय्यक भरत पवार यांनी शेतीशाळेतील शेतकऱ्यांची निवड करून त्यांना शेतीशाळेचे ऊद्दिष्ट व महत्व समजावुन सांगुन आलेल्या अधिकारी वर्ग व शेतकऱ्यांचे आभार प्रदर्शन व्यक्त केले.



