मनसैनिक अयोध्येत दाखल ; राज ठाकरेंचा अपुर्ण दौरा पूर्ण केल्याचा दावा
अयोध्या : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना आपला अयोध्या दौरा तुर्तास स्थगित करावा लागला. पण असे असले तरी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी ठरलेल्या तारखेला म्हणजेच 5 जूनचा मुहूर्त चुकवला नाही आणि अयोध्येत दाखल झाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच त्यांना तेथील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला. इतकेच नाही तर जोपर्यंत उत्तरभारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशाराच बृजभूषण सिंह यांनी दिला होता. राज ठाकरेंनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव आणि होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे आपला दौरा स्थगित केला. पण मनसैनिकांनी बृजभूषण सिंह यांच्या विरोधाला न जुमानता अयोध्येत दाखल झाले आहेत.
ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव हे मनसेच्या कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत दाखल झालेल्या अविनाश जाधव यांनी तेथून एक व्हिडीओ सुद्धा शूट करुन आपल्या फेसबूकवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अविनाश जाधव यांनी म्हटलं, “आजची तारीख पाच जून… सन्माननीय श्री राजसाहेब यांचा अयोध्या दौरा होता काही कारणास्तव तो रद्द झाला पण त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो पूर्ण केला मराठी माणसाचा स्वाभिमान जपला”.
अविनाश जाधव यांनी म्हटलं, “मी अविनाश जाधव मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष… मी आत्ता आहे अयोध्येत. राम जन्मभूमीत आम्ही दाखल झालो आहोत. रामलल्लाचं दर्शन प्रत्येक हिंदूनने घेतलं पाहिजे. आज मी इथे आलो आहे. मी प्रत्येक मराठी बांधवांना विनंती करतो की तुम्ही अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनाला या. आज 5 तारीख आहे आणि एक मराठी माणूस अयोध्येत आला आणि त्याने श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे.”