राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही : रामदास आठवले
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेतून आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत असल्यामुळे राज्य सरकार अल्पमतात आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचं रामदास आठवले यावेळी म्हणाले आहेत
हे सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. कारण ३७ आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे मोठा गट शिंदेंसोबत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार, अजित पवार यांनी आमच्याकडे बहुमत आहे अशी भूमिका मांडणं अयोग्य आहे. आपल्याला बहुमत सिद्ध करण्याचा अधिकार आहे. पण इतके आमदार वेगळे झालेले असताना बहुमत असूच शकत नाही. त्यामुळे या सरकारला निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही”, असं ते म्हणाले.
दरम्यान, शिंदेंसोबत असणाऱ्या १६ आमदारांना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात असलं, तरी ते शक्य नसल्याचं आठवले म्हणाले. “१६ आमदारांना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पण तो अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना नाही. ३७ आमदारांचा गट दोन तृतियांश बहुमताने एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीला अजिबात धक्का लागू शकत नाही. व्हीप सभागृहात असतो, बाहेर नसतो. त्यामुळे एखाद्या बैठकीला हजर राहिले नाही, म्हणून त्यांना पक्षातून काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण त्यांची आमदारकी रद्द करण्याचा अधिकार विधानसभा उपाध्यक्षांना नाही”, असं त्यांनी नमूद केलं.



