मुसळधार पावसाची शक्यता ; पुढच्या ५ दिवसांसाठी मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना इशारा
मुंबई : येत्या ५ दिवसांमध्ये राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या दोन दिवसांमध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता असून त्यानंतरच्या ३ दिवसांतही राज्यातल्या काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हवामान खात्याने, मच्छिमारांसाठी देखील इशारा जारी केला आहे आणि त्यांना २० जून रोजी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसासाठी सध्या पाऊस पोषक वातावरण असून यामुळे चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्रासह घाट विभागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला तर मुंबईलाही विकेन्डसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड अशा आदी भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यांमधील घाट परिसरातही पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या कोकणामध्ये हलक्या पावसाला सुरुवात झाली असून मराठवाडा विदर्भामध्येही काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. पण येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय मान्सूनच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, १८ जूनपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे हवामान खात्याने, मच्छिमारांसाठी देखील इशारा जारी केला आहे आणि त्यांना २० जून रोजी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सखल भागात आणि शहरी भागात पूर येणे, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत होणे, रस्ते, रेल्वे, हवाई आणि नौका वाहतुकीला अडथळा आणि अधूनमधून ४०-५० पर्यंत वेग असलेले सोसाट्याचे वारे. तर किनार्याजवळ ताशी ६० किमी वेगाने वारे वाहत आहे, परिणामी असुरक्षित/तात्पुरत्या संरचनेचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.