‘आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिकून मोठे झाले पाहिजे, हाच आमचा मानस’ : हर्षवर्धन रंधे
बोराडी ता.शिरपूर (प्रतिनिधी) आमचे पणजोबा, थोर स्वातंत्र्यसेनानी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांच्या विचारसरणीवर चालून सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी व नवसंजीवनी पाडयातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत. त्यानुसार आज विद्यार्थ्यांना सहाशे शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणुन प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिकून मोठे झाले पाहिजे हाच आमचा मानस असल्याचे प्रतिपादन कर्मवीर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष हर्षवर्धन रंधे यांनी रोषमाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा बोराडी ग्राम परिषदेचे उपसरपंच राहुल रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप प्रसंगी बोलत होते.
प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा बोराडी ग्राम परिषदेचे उपसरपंच राहुल रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर येथील कर्मवीर प्रतिष्ठानच्यावतीने आदिवासी भागातील ६०० विद्यार्थ्यांना दफ्तर व शालेय साहित्य वाटप आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष हर्षवर्धन रंधे होते.तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तोंदेचे माजी सरपंच बाबा पाटील, शिरपूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तारधिकारी आर.के. गायकवाड,राज सिसोदिया, दिपक रंधे, शेखर माळी,अंबादास सगरे,प्रसाद गोसावी, मुकेश जाधव, विकास पाटील, रामपुरा येथील मानसिंग महाराज, जगन पावरा, शालेय समितीचे अध्यक्ष आत्माराम पावरा, बीरसिंग पावरा,प्राथमिक शिक्षक नरेंद्र संदीप, सुरेश बागुल, राहुल बेहरे, हरीश कलळे संजू ठाकरे, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी रोशमाळ जिल्हा परिषद शाळेत शालेय दप्तर व साहित्य वाटपाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष हर्षवर्धन रंधे यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर सातपुड्यातील रामपुरा, रोषणमाळ, इगाण्यापाडा, रोलसिंग पाडा, नवादेवी, साकळीपाडा, सामरादेवी, निशाणपाणी, कंज्यापाणी, कढईपाणी, प्रधाणदेवी, मेंढाबल्ली, थुवानपाणी, काकडपाणी, कोळश्यापाणी आदी आदिवासी व नवसंजीवन पाड्यांवरील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे परिसरात कौतुक करण्यात आले.