गोव्याचे भविष्य भूमाफिया, भ्रष्टाचारी ठरवतात ; संजय राऊतांचा घणाघात
मुंबई (प्रतिनिधी) गोव्यातील सामान्य नागरिकांना आम्ही प्रस्थापितांविरूद्ध आम्ही उभे करू. गोव्याचे राजकारण प्रस्थापितांच्या हाती गेले आहे. म्हणजेच भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया आणि भूमाफिया यांच्या हातात गोव्याच्या राजकारणाची सूत्रे आहेत आणि ते गोव्याचे भविष्य ठरवतात. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत केली
“गोव्यातील सामान्य लोकाना प्रस्थापितांविरूद्ध आम्ही उभा करू. गोव्यातील राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेलं आहे. म्हणजे भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया यांच्या हातात गोव्याच्या राजकारणाची सूत्रं आहेत आणि ते गोव्याचं भविष्य ठरवतात. हे जर मोडायचं असेल, तर गोवेकरांनी आपल्यातील सामान्य लोकाना निवडणुकीत मतदान करावं आणि निवडून आणावं. जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. सामान्यातील सामान्य माणसाला त्यांनी, उमेदवाऱ्या देऊन आमदार, खासदार आणि मंत्री केलं. गोव्यात हे होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू.” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
तसेच, “राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तर महाराष्ट्रातही आघाडी आहे, काँग्रेसही आमच्यासोबत आहे. परंतु, गोव्यात त्यांची जागा वाटपासंदर्भात काही मजबुरी असेल, आमची चर्चा देखील चांगली सुरू होती, मात्र नाही होऊ शकलं. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील त्यांच्याशी चर्चा फिस्कटली. तर याचा अर्थ असा नाही की आम्ही निवडणूक लढणार नाही.” असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.
याचबरोबर, “ गोव्याचं राजकारण जर तुम्ही पाहिलं. तर मोजके दहा-बारा लोकच गोव्याचं राजकारण करतात. तेच कधी या पक्षात असतात तर कधी त्या पक्षात असतात, तेच ठरवतात गोव्याचं भविष्य. त्यामध्ये मोठ्याप्रमाणावर भूमाफिया आहेत. ड्रग्ज माफिया आहेत आणि कोणत्याही पक्षात कोणी चांगलं नाही कोणत्याही पक्षात. तुम्ही पाहा भाजपात अशातच जे लोक गेलेले आहेत, ज्यांचा संबंध ड्रग्ज माफियांशी आहे आणि हे सर्वांना माहिती आहे. भ्रष्टाचाराने तर या लोकाचं जुनं नातंच आहे. तर आम्हाला असं वाटतं की गोव्याच्या जनतेने यंदा अशा लोकाना निवडून द्यावं, जे सामान्य व्यक्ती आहेत. सामान्य नागरिक आहेत जे निवडणूक लढवतील. तर आम्ही असे उमेदवार देऊ जे लोकांमधून असतील. जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं.” असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.