भाजपमध्ये ४० वर्ष असताना चांगला, राष्ट्रवादीकडं गेलो की वर्षात ईडी लावता : एकनाथ खडसे
जळगाव (प्रतिनिधी) एका वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो की मागं ईडी लावता.मी चाळीस वर्ष तुमच्याबरोबर होतो तेव्हा चांगला होतो. आता एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की तुम्ही ईडी लावता आणि तुम्ही तारीख पे तारीख सुरु असल्याचं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपवर व देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता एकनाथ खडसे यांनी जहरी टीका केली आहे.
भाजपमध्ये काम करत असताना पक्षाच्या विस्तारासाठी गाव पातळीवर काम केलं, परिश्रम केलं, कष्ट केलं हे तुम्ही पाहिलं आहे. अनेक लोक घडवले, पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. नाथाभाऊच्या आशीर्वादनं मोठे झाले. कोणी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य केले, जिल्हा परिषद अध्यक्ष केले. या ठिकाणी मेहनतीनं कष्टानं माणसं उभं केली आणि घडवली. ४० वर्ष रक्ताचं पाणी करत पक्षासाठी फिरत होते. ३० वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढं पक्ष वाढत गेला. गावागावामध्ये पक्ष पोहोचला, साऱ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मेहनत आम्ही केली.
अलीकडचे राजकारण कशाप्रकारे चालते हे तुम्ही पाहत आहे. कोणाच्या मागे कशा ईडीच्या चौकशा लावल्या जाता ते तुम्ही पाहताय. ४० वर्षांमध्ये मी तुमच्या सोबत चांगला होतो. एक वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की मागं ईडी लावता. तारीख पे तारीख सुरु करता. ज्या माणसाच्या बळावर तुम्ही इतके दिवस उभे राहीले आणि आता त्याचा अपमान करता. त्याचे फळे तुम्हाला भोगावे लागतील जनता तुम्हाला येणाऱ्या कालखंडात माफ करणार नाही, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहेय



