आत्महत्याग्रस्त कुटुंबास शासनाची सर्वोतोपरी मदत मिळवून देवू : राज्यमंत्री अब्दुल सत्तार
पिंपळदरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची सांत्वन भेट
सिल्लोड (प्रतिनिधी) पिंपळदरी ता. सिल्लोड येथे शुक्रवार रोजी सदानंद गुलाबराव गव्हाणे व त्यांची पत्नी ज्योती गव्हाणे या शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवार (दि.4) रोजी पिंपळदरी येथे शोकाकुल गव्हाणे कुटुंबाच्या घरी जावून कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.
आत्महत्याग्रस्त गव्हाणे कुटुंबाला स्वपदरची तसेच शासनाच्यावतीने आर्थिक मदत, कुटुंबातील मुलांना सरकारच्यावतीने शिक्षणाची सुविधा यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कुटुंबाला दिली. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून याबाबत पंचनामा करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासन घेईल. त्यासोबतच पीडित कुटुंबाला घरकुल, अंत्योदय योजनेतून मोफत धान्य, बालगृह अशा विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. एखाद्या घरात कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाची वाताहत होते. सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून पिंपळदरी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंब स्वबळावर उभी राहावे. यासाठी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केल्या जाईल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
आत्महत्या हा पर्याय नाही
सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही असे स्पष्ट करीत शासन शेतकऱ्यांच्या खंबीर पाठीशी आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही अडचणी असल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात जेणे करून त्या समस्येची सोडवणूक करण्यात येईल. आत्महत्या मुळे आपल्या कुटुंबाचे प्रश्न सुटत नाहीत, उलट यात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.
यावेळी तहसीलदार विक्रम राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, सतीश ताठे, नॅशनल सुतगीरणीचे संचालक राजेंद्र राठोड, मारुती वराडे, राजुमिया देशमुख यांच्यासह माजी सरपंच बाबुराव दौड, शिवसेना शाखाप्रमुख गणेश काळे, युवासेनाचे सलीम पठाण, विनोद चव्हाण आदींसह शोकाकुल गव्हाणे परिवारातील सदस्य व गावकऱ्यांची उपस्थिती होती.
अब्दुल सत्तार यांनी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याच्या मुलांशी साधला संवाद
आत्महत्या केलेल्या दाम्पत्याला प्रेमानंद (वय १३) व वैष्णवी (वय ८) असे दोन मुले आहेत. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आस्थेने या मुलांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. संवाद साधत असताना या मुलांनी व्यक्त केलेल्या भावना एकूण उपस्थित सर्वानाच गहिवरून आले होते.