दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच ; पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ
मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे. जाणून घ्या दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षेसाठीची नियमावली काय आहे.
पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ
यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे अतिरिक्त वेळ तर ७० गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.
कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसाठी सवलत
परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुरवणी परिक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल. जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षाही दोन वेळेस देण्याची संधी असेल.
परीक्षार्थींना लसीकरण बंधनकारक नाही
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरणाचं बंधन नसेल. मात्र, पालकांनी पाल्याचे लसीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे. राज्यात दहावी आणि बारावीच्या ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्याचे लसीकरण झाल्याची माहिती आहे.
परीक्षा केंद्र आणि व्यवस्था
परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त २५ विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील. विद्यार्थ्याच्या जवळचे परीक्षा केंद्र देण्याची सोय करण्यात येईल. शाळेत अधिक विद्यार्थ्यी असल्याचं त्याच शाळेत परीक्षा केंद्र करण्यात येईल.