किरीट सोमय्यांबद्दल विचारताच संजय राऊत संतापले ; म्हणाले…!
मुंबई : ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोपांची तोफ डागली. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली जमा केलेला पैसा राज्यपाल कार्यालयाने मिळाला नसल्याचं पत्र पाठवलं असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. मात्र यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरले.
“किरीट सोमय्या विक्रांत वाचवा असे टी शर्ट घालून फिरत असताना लाखो, करोडो लोकांनी त्यांना पैसे दिले. याशिवाय अनेक कंपन्यांकडून त्यांनी विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी गोळा केले. ही रक्कम ५७ ते ५८ कोटी होती अशी माहिती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
“महात्मा किरीट सोमय्या यांच्या मुलाखती मी वाचल्या. यावर त्यांनी या सरकारला देशभक्ती नाही असं म्हटलं होतं. २०० कोटी गोळा करणार असून ते राजभवनात जमा करु असं त्यांनी सांगितलं होतं. माझ्याकडे राज्यपाल कार्यालयातून आलेलं पत्र आहे. आरटीआय कार्यकर्त्याने राज्यपालांना २०१३, २०१४, २०१५ विक्रांतसाठी जे पैसे गोळा केले होते ते जमा झालेत का? अशी विचारणा केली. यावर राज्यपाल कार्यालयाने असे कोणतेही पैसे जमा करण्यात आलेले नाहीत असं उत्तर देण्यात आलं. देशाच्या सुरक्षेशी, राष्ट्रीय भानवेशी केलेली ही फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केली आहे. देशद्रोही किरीट सोमय्यांनी ५७ कोटी जमा केले. पण हा आकडा १०० कोटींच्या वर असावा असं मला वाटतं अंस राऊत म्हणाले. आता आपल्याला तर काही समजलं नाही असं ते म्हणतील सांगत संजय राऊतांनी फोटो दाखवले. “आम्ही चर्चगेट स्टेशनला त्या डब्यात ५ हजार टाकल्याचं मला अनेकांनी सांगितलं आहे. ही रक्कम कुठे गेली? कोणाच्या घशात गेली? ही रक्कम भाजपाने निवडणुकीत वापरली की किरीट सोमय्यांची कंस्ट्रक्शन कंपनीत वापरले?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली.
“हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली गोळा केलेले पैसे कोणाच्या खिशात गेले याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी चौकशी केलीच पाहिजे, पण केंद्रीय तपास यंत्रणा जर पारदर्शक आणि निष्पक्ष असतील तर सीबीआय, इन्कम टॅक्स आणि भाजपाची पदाधिकारी असणारी ईडी यांनी चौकशी करावी. त्यांना काही सापडत नसेल तर मी मदत करेन,” असं संजय राऊतांनी सांगितलं. यात अनेक लोक आहेत पण सोमय्या या भ्रष्टाचाराच्या कटाचे सूत्रधार आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला.
संजय राऊतांची पत्रकार परिषद संपल्यानंतर किरीट सोमय्या यांनी यावर प्रत्युतर दिलं. यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी आले. “राज्यपाल भाजपाचेच आहेत, आमचे शाखाप्रमुख तिथे बसलेले नाहीत. भाजपाचे आधारस्तंभ असणाऱ्या राज्यपालांच्या कार्यालयाने जर पैसे जमा झाले नसल्याचं सांगण्यात येत असेल तर यापेक्षा वेगळा पुरावा असेल तर या माणसाने डोकं, मेंदू तपासून घ्यावा. तुम्ही दाखवता ते पुरावे आम्ही दाखवतो ते काय शेंगदाण्याचे कागद,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली.
संजय राऊतांचा हा नवीन पराक्रम असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं असता संजय राऊतांनी येड** असा आक्षेपार्ह शब्द वापरला. “येड** आहे तो, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. महाराष्ट्रात अशा चु** लोकांना स्थान नाही. महाराष्ट्राला लागलेली ही कीड असून ही कीड संजय राऊत, शिवसेना संपवणार. हा चु** पराक्रम काय सांगतो मला,” अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.