युवारंग तिसऱ्या दिवशी लोकगीत नृत्याने धमाल ; महाविद्यालयातील आवारात विद्यार्थ्यांचा जल्लोष
शहादा (राजू शिंदे) युवारंग युवक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थी कलावंतांनी ‘ वारकऱ्यांची दिंडी, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे शिबली नृत्यासह इतर कलाविष्कार दाखवत उपस्थितांवर मोहिनी घातली. विद्यार्थी कलावंतांनी विविधतेत एकात्मतेचे दर्शन घडविल्यामुळे महोत्सवाच्या परिसरात संपूर्ण भारत अवतरल्याचे दिसत होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवाच्या तिसरा दिवस समुह लोकनृत्य, शास्त्राय नृत्य, लोकसंगीत, वक्तृत्व, फोटोग्राफी, चित्रकला, इन्स्टॉलेशन, मेहंदी या कला प्रकारांचे पाचही रंगमंचावर सकाळ पासून सादरीकरणाला सुरूवात झाली. युवारंगच्या मंचावर जणू भारत अवतरला होता.
खुला रंगमंच क्र.१ वर (स्वा.से.अण्णासाहेब पी.के.पाटील रंगमंच) समुह लोकनृत्य या कला प्रकारात २६ संघांनी आपला सहभाग नोंदवत भलरी, पावरा नृत्य, शिबली नृत्य, आदिवासींच्या डोंगरातील देवाला प्रार्थना करणारे नृत्य, बंजारा नृत्य, टिपरी नृत्य, राजस्थानी नृत्य, बधाई नृत्य, कोळी नृत्य, खंडेरायाचा गोंधळ, भवाई नृत्य, जोगवा, पराईअट्टम नृत्य, आदिवासी पावरा लगीन नृत्य, डांगी नृत्य, दालखाई नृत्य, हरीयानवी नृत्य, दिंडी नृत्य या समुह लोकनृत्यांचे सादरीकरण केले. ढोल, नगारा, बासरी, पावरी, डफ, तारी, घुंगरूमाळ या वाद्यांचा अत्यंत कलात्मकतेने केलेल्या वापरामुळे आणि नृत्यासाठी विविध प्रांतातील लोककलेसाठी अभिप्रेत असलेले पोषाख काठेवाडी, गुजराती, आदिवासी, भिल्ल, नऊवारी, धोती-कुर्ता परिधान केले होते त्यामुळे प्रत्येक नृत्याने लक्ष खिळवून ठेवले.
रंगमंच क्र.१ स्वातंत्र सेनानी अण्णासाहेब पी.के.पाटील रंगमंच:- डॉ.डी.एम.पाटील, डॉ.एस.के.तायडे, प्रा.एस.पी.जोशी, डॉ.ए.एच.जेबानपुत्रा, श्रीमती विणा पाटील, सौ.सुनिता एम.पाटील, प्रा.उमेश यु.पाटील, प्रा.मिलिंद जे. पाटील, प्रा.एन.डी.पाटील, प्रा.प्राची दुसाणे, प्रा.अमृता पाटील, प्रा.आकाश जैन, प्रा.अमित धनकाणी, प्रा.लक्ष्मी धनकाणी, प्रा.जागृती पवार, डॉ.भरत चौधरी हे रंगमंचाची जबाबदारी सांभाळत आहेत.
बंदिस्त रंगमंच क्र.२ वर (बालहुतात्मा शिरीष कुमार रंगमंच) सकाळी शास्त्रीय नृत्य स्पर्धा सुरू झाली. केरळ, ओरिसा, आंध्र प्रदेश, मणिपूर या राज्यातील शास्त्रीय नृत्यांचे अव्वल दर्जाचे सादरीकरण झाले. या स्पर्धेत ७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवित भरतनाट्यम, कथ्थक, कथकली, कुचीपुडी आदी नृत्य प्रकार सादर केले. लयबध्द पदन्यास, नृत्यरसानुसार बदलणारे चेहऱ्यावरील भाव, हातांची मोहक आणि वेगवान हालचाल आणि सर्वांच्या जोडीला अनुरूप वेशभूषा, केशभूषा यामुळे कधी दक्षिण भारताच्या देवालयात, तर कधी मणिपूरमध्ये असल्याचा भास होत होता. दुपारी २ वाजता लोकसंगीत या स्पर्धेला सुरुवात झाली. या ८ स्पर्धेत संघानी आपला सहभाग नोंदवत विविध वाद्यांचा सुरेल मेळ घालुन स्पर्धकांनी गोंधळ, लावणी, आदिवासी मिरवणूक आदी प्रकार दणक्यात सादर करून लोकसंगीताच्या समृध्द पंरपरेला उजाळा दिला. शंख, सनई, खंजरी, बासरी, तूणतूणे, संबळ, घागर, तंतूवाद्य, ढोल, घुंगरू, टाळ, व डवळी वाद्यांच्या सहाय्याने गीतांचे सादरीकरण करण्यात आले.
रंगमंच क्र.२ हुतात्मा बाल शिरीषकुमार रंगमंच:- डॉ.वाय.के.शिरसाठ, प्रा.आर.बी.लोहार, प्रा.आर.व्ही.पाटील, प्रा.राजेंद्र पाटील, श्रीमती के.के.पटेल, प्रा.ए.जे.पाटील, प्रा.सौ.उर्मिला पाटील, प्रा.सौ.एस.जी.पाटील, प्रा.प्रसाद पाटील, प्रा.एम.एम.चितोडे रंगमंचाची जबाबदारी सांभाळत आहेत.
बंदिस्त रंगमंच क्र.३ वर (हुतात्मा लालदास शहा रंगमंच) भारताला स्वातंत्र्य मिळूण आज ७५ वर्षे झाली. आपणास काय हवे होते आणि नको हवे होते. याचे सिंहावलोकन होणे गरजेचे आहे. भारताने अनेक क्षेत्रात खुप मोठी प्रगती केली. उपग्रह सोडण्यासाठी आपणास अमेरिका, रशिया या देशावर निर्भर राहावे लागत होते. इस्त्रो स्थापन झाली आपण या क्षेत्रात पुढे गेलो. हिरतक्रांती केली, विकसनशील झाले. सर्वच क्षेत्रात आपण विकास केला. मात्र याच बरोबर देशात धर्माच्या, जातीच्या-पंथाच्या नावाने राजकारण केले जाते. जातीय दंगली घडवून आणल्या जातात. अधंश्रध्देत आपला देश गुरफटला आहे. जर भारत महासत्ता व्हावा असे वाटत असेल तर जातीयवाद, धर्मवाद संपवायला हवा. माणूस ही एकच जात, धर्म व पंथ व्हावा. अशी स्पर्धकांनी पोटतिडकीने मांडणी केली. तर स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही. आम्ही आमचे स्वातंत्र्य विकतो, आमचा हक्क विकतो मतदान करतांना पैसे घेता. स्वातंत्र्य म्हणजे देशासाठी त्याग. भारताला महासत्ता होण्यासाठी जात-धर्म-पंथ- प्रांतवाद सोडून आज एकत्र येण्याची गरज आहे. असा आशावादही व्यक्त करण्यात आला. आज देश स्वतंत्र झाला पण माणूस माणूसकी विसरला असल्याचे मत महाविद्यालयीन तरुणाईने वक्तृत्व स्पर्धेत ठामपणे मांडले. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: भारताची महासत्तेकडे वाटचाल’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेत ५७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या विषयावर स्पर्धक आपले मत मांडत असताना एरवी जल्लोष करणारी तरुणाई शांतपणे व एकाग्रतेने प्रत्येक युवा वक्त्याचे म्हणणे ऐकून घेत होते. युवकांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द चिंतन, मनन करण्यास प्रवृत्त करत होता.
रंगमंच क्र.३ हुतात्मा लालदास शहा रंगमंच:- डॉ. यु.व्ही. निळे, प्रा.सी.आर.पाटील, प्रा.मंगला बी.पाटील, प्रा.राकेश कापगते, प्रा.अर्पणा किरण परदेशी, प्रा.रोशन चौधरी, प्रा.समिर शेख, प्रा.एम.एस.चौधरी हे रंगमंचची जबाबदारी सांभाळत आहेत.
बंदिस्त रंगमंच क्र.४ वर (वीर भगतसिंग रंगमंच) सकाळी ८ वाजता फोटोग्राफी प्रथम फेरी स्पर्धेस सुरूवात झाली. यात ३५ स्पर्धक सहभागी झाले. त्यांनी महोत्सव परिसरातील छायाचित्रे टिपली. त्यातून १० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. दुपारी २ वाजता फोटोग्राफी अंतिम फेरीस सुरूवात झाली. युवारंग दरम्यान टिपलेली छायाचित्रे संपूर्ण युवारंगावरच प्रकाश टाकणारी होती. त्यामुळे युवारंगच्या आठवणींनादेखील उजाळा मिळाला.
रंगमंच क्र.४ विर भगतसिंग रंगमंच:- प्रा. डॉ. एस.डी. शिंदखेकर, प्रा.एस.एस.पाटील, डॉ.जी.बी. कुवर, प्रा.एम.जे.चौधरी, प्रा.विकेश पावरा, प्रा.गिरीष चौधरी, डॉ.जगदीश चौधरी, प्रा.सनील गुंजाळ, प्रा.रविंद्र बागले, प्रा.मिना पाटील, प्रा.गायत्री राठोड, प्रा.एस.पी.पाटील हे रंगमंचची जबाबदारी सांभाळत आहेत.
बंदिस्त रंगमंच क्र.५ वर (वीर बिरसामुंडा रंगमंच) सकाळी ८ वाजता चित्रकला स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेत ५७ सहभागी स्पर्धकांना भोंगा, लॉकडाऊन, भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव हे विषय देण्यात आले. याच मंचावर १०.३० वाजता इनस्टॉलेशन स्पर्धा सुरू झाली. ३१ स्पर्धकांनी महाविद्यालय परिसरातील वापरात नसलेल्या काही वस्तुंपासून आदिवासी संस्कृती, पर्यावरण आणि युवारंग या विषयावर कलात्मक मांडणी करीत सामाजिक संदेश दिला. दुपारी २ वाजता मेहंदी स्पर्धेला सुरूवात झाली यात सहभागी ६३ स्पर्धकांनी आपल्या सोबतच्या मैत्रिणीच्या हातावर मेहंदी काढत होत्या. मेहंदी स्पर्धेत चुरस दिसून आली.
रंगमंच क्र.५ विर बिरसामुंडा रंगमंच:- डॉ.डी.एस.सुर्यवंशी, डॉ.एस.एस.पाठक, प्रा.एस.आर.उजगरे, प्रा.बी.एस.पाटील, प्रा.व्ही.बी नेरकर, प्रा.रेखा पाटील, प्रा. केशव कोळी, प्रा.धनका मनिलाल, प्रा.पाडवी आर.आर. प्रा.अल्का पोकळे, मोनिका पाटील, एच.एल.पाटील हे रंगमंचची जबाबदारी सांभाळत आहेत.
युवारंगाचा शनिवारी होणार समारोप
युवारंग महोत्सवाचा शुक्रवार अखेरचा दिवस असल्याने संपूर्ण दिवसभर विविध प्रकारचे समुह लोकनृत्य, शास्त्राय नृत्य, लोकसंगीत, वक्तृत्व, फोटोग्राफी, चित्रकला, इन्स्टॉलेशन, मेहंदी आदी कला तरुणाईने सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. शनिवारी तीन दिवस चाललेल्या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात येणार असून पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब पी.के.पाटील रंगमंच क्र.१ वर सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे. प्रसिध्द अभिनेता जयवंत वाडकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल. अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ शहादाचे अध्यक्ष दीपक पाटील असतील. प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा सदस्य आ.राजेश पाडवी, विधान परिषद सदस्य आ.सुधीर तांबे, पू.सा.गु.वि.प्र.मंडळाच्या मानद सचिव कमलताई पाटील, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.एस.टी.इंगळे उपस्थित राहतील.