
हैदराबाद: तेलंगणा विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. नेत्यांच्या रॅली, सभांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी तेलंगणातील महमूदनगरमध्ये एका जनसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्यात हळद बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. यामुळे हळदीचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
कोविड काळात जनमानसात हळदीबद्दलची जागरुकता वाढली. जगभरातून हळदीला मागणी आहे. या मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे हळदीचं उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे, असं पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले. मोदींनी हळद बोर्डाच्या स्थापनेची घोषणा करताच स्थानिक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मोदींच्या घोषणेनंतर एका शेतकऱ्यानं जवळपास १२ वर्षांनी चप्पल घातली.
बकऱ्यांसाठी गवत कापायला गेला अन् परतताच करोडपती झाला; मजुराचं नशीब पालटलं, गावात आनंदीआनंद
निजामाबाद जिल्ह्याच्या पालेम गावात राहणारे शेतकरी मुत्याला मनोहर रेड्डी गेल्या कित्येक वर्षांपासून तेलंगणात हळद बोर्डाची स्थापना करण्याची मागणी करत होते. हळदीच्या पिकाला योग्य दर मिळत नसल्यानं अनेक शेतकरी त्रस्त आहेत. हळदीला हमीभाव मिळत नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. राज्यात हळद बोर्ड स्थापन झाल्यास ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असं रेड्डींनी वाटायचं.
जोपर्यंत हळद बोर्ड स्थापन होत नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा पण रेड्डींनी ४ नोव्हेंबर २०११ रोजी केला. हळद बोर्डाच्या स्थापनेसाठी त्यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना अर्ज दिले. २०१३ मध्ये ते आर्मोरहून तिरुपतीला चालत गेले. व्यंकटेश्वर स्वामींकडे प्रार्थना केली. तब्बल १२ वर्षे रेड्डींचा संघर्ष सुरू होता. अखेर पंतप्रधान मोदींनी रविवारी घोषणा केल्यानंतर रेड्डींनी निजामाबाद कृषी बाजार कार्यालयात चप्पल घातली. त्यांनी मोदींचे आभार मानले.



