‘तो’ मुख्य रस्ता नगरपालिकेने केला मोकळा ; नागरिकांनी मुख्याधिकारी यांचा केला सत्कार
अमळनेर : तब्बल ४० वर्षे व्यापाऱ्याने पत्र्याचे शेड लावून अडवून ठेवलेला मुख्य रस्ता नगरपालिकेने मोकळा करून दिल्याने हजारो नागरिकांची समस्या सुटली असून मुख्याधिकाऱ्यांनी परखड भूमिका घेऊन तातडीने कार्यवाही केल्याबद्दल नागरिकांनी अतिक्रमण काढतानाच त्यांचा जाहीर सत्कार केला.
धुळे चोपडा राज्य मार्ग १५ पासून शहरातील पिंपळे रोड, ढेकू रोड, मार्गे शिंदखेडा बेटावद राज्य मार्ग सहा ला जोडणारा मुख्य रस्ता गेल्या ४० वर्षांपासून व्यापाऱ्यानी त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी अतिक्रमण करून बंद करून ठेवला होता. या परिसरात हजारो नागरिक ये जा करतात त्यांना देखील या भागात रस्ता असल्याचा विसर पडला होता. पावसाळ्यात कॉलन्यांमध्ये पाणी शिरत असल्याने इतर भागातून पाच धोकादायक वळणे घेत पाण्यातून जावे लागत होते. यात वाहनांची नासाडी होत होती. तसेच वाहतूक देखील काही तास खोळंम्बत होती. यापूर्वी अनेकदा मागणी करून निवेदने देऊन देखील रस्त्याबाबत तत्कालीन लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांनी काहीच कार्यवाही केली नव्हती. नगरसेवक विवेक पाटील, संजय पाटील यांच्यासह नागरिकांनी हा रस्ता पावसाळ्यापूर्वी मोकळा करण्याची मागणी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे केली. सरोदे यांनी तात्काळ दखल घेऊन नकाशामधील रस्त्याच्या शोध घेऊन व्यापाऱ्याला नोटीस देण्यात आली. व्यापाऱ्याने देखील सुरक्षेसाठी रस्ता अडवल्याचे कबुल केले. २४ रोजी सकाळी मुख्याधिकारी सरोदे यांच्यासह अभियंता अमोल भामरे, अभियंता नगररचनाकर विकास बिरारी, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, अरविंद कदम, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, विजय सपकाळे, योगेश पाटील यांच्यासह जेसीबी मशीन व इतर ताफा हजर झाला. रस्त्यातील कंपाऊंड, पत्र्याचे शेड, झोपड्या, झाडे, काटेरी बाभूळ काढून रस्ता काही तासात मोकळा केला. नागरिकांनी आनंद व्यक्त करत मुख्याधिकारी सरोदे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला. यावेळी दीपक चव्हाण, राहुल चौधरी, कैलास बोरसे, बाविस्कर, कुंदन पाटील, गोसावी, बी ए पाटील हजर होते.