हिंदुत्व शब्द लिहिता येतो का? ; संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना केलं लक्ष्य
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेतील या बंडावर भाष्य केले असून मंत्री गुलाबराव पाटील, मंत्र संदिपान भुमरे तसेच उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उघड पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त करणारे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्यावर टीका केली आहे. संदिपान भुमरे यांनी हिंदुत्व शब्द हिलून दाखवावा असा टोला राऊत यांनी लगावला आहे. ते एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते कारण कोरोनाच्या काळात अनेक बंधनं होती. त्याचं आजारपण होतं. या सर्वाचा विचार स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेणाऱ्यांनी करावा. संजय शिरसाट यांनी पत्र पाठवलं. त्यांना लिहिता येतं का? समोर बसून तेच पत्र त्यांना लिहायला सांगा” असे म्हणत राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पत्र लिहिणाऱ्या संजय शिरसाट यांच्यावर खोचक टीका केली.
तसेच बंडखोर आमदारांमध्ये पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांचादेखील समावेश आहे. ते महाविकास आघाडी सरकारध्ये मंत्री आहेत. मात्र मंत्रिपद असूनही त्यांनी बंड पुकारले आहे. भुमरे यांच्यावरही राऊत यांनी खोचक टीका केली आहे. “संदिपान भुमरे सहा वेळा आमदार झाले आहेत. त्यांना तिकीट मिळावे म्हणून मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वाद घातला होता. मोरेश्वर सावे यांचे तिकीट कापून आम्ही त्यांना तिकीट दिले होते. त्यावेळी हे पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यावर सुरक्ष रक्षक म्हणून काम करत होते. ते आज कॅबिनेटमंत्री आहेत. हे आम्हाला कुठलं हिंदुत्व सांगत आहेत. त्यांना हिंदुत्व शब्द लिहिता येतो का? वर्गणी करुन लोकांनी त्यांना निवडून आणलेले आहे. मात्र आता हे निवडून येणार नाहीत,” असे संजय राऊत म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी काही प्रमुख मंत्री वर्षा बंगल्यावर बसले. पुढील योजनेसंदर्भात चर्चा सुरु होती. मात्र गुलाबराव पाटील असतील, दादा भुसे असतील हे सगळे वरिष्ठ मंत्री आहेत ते दुसऱ्या दिवशी गुवाहाटीला निघून गेले. गुलाबराव पाटील हे शिवसेनेतील सर्वात जुने आहेत. त्यांची भाषणं ऐकली असतील तर ते माझ्यासारख्या पानटपरीवाल्याला शिवसेनेने कसं मोठं केलं याबाबत स्वत: सांगायचे. आता ते पळून गेले. याला काय म्हणायचं?” अशी टीका संजय राऊत यांनी शिवसेनेचे नेते तथा आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर केली.



