भाजपशासित राज्यात विद्वेष वाढतोय, आपण लक्ष घाला’ ; १०८ माजी सरकारी अधिकाऱ्यांचं पंतप्रधानांना पत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजप शासित राज्यात विद्वेष वाढत असून अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी करणार पत्र 108 माजी सरकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना पाठवलं आहे. माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या या पत्रात देशात वाढता विद्वेष आणि कट्टरतावादी राजकारणावरुन चिंता व्यक्त केली आहे.

पत्रात नेमकं काय लिहिलंय ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना या १०८ माजी अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये देशात सध्या अल्पसंख्याक समाजाबद्दल द्वेषाची भावना वाढीस लागल्याचं नमूद करण्यात आलं आहे. “सामान्यपणे माजी प्रशासकीय अधिकारी म्हणून अशा पद्धतीने टोकाला जाऊन आमच्या भावना व्यक्त करणं ही काही आमची इच्छा नसते. पण ज्या वेगाने आपल्या संविधानकर्त्यांनी तयार केलेली देशाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त केली जात आहे, ते पाहाता आम्हाला नाईलाजाने आमचा संताप आणि वेदना अशा पद्धतीने व्यक्त कराव्या लागत आहेत”, असं १०८ अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेल्या या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

या पत्रामध्ये भाजपाशासित राज्यांमध्ये अल्पसंख्याक समाजाची हेटाळणी होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. “आसाम, दिल्ली, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या भाजपाशासित राज्यांमध्ये अल्पसंख्याक समाजाविरुद्ध द्वेष आणि हिंसाचार वाढू लागला आहे. विशेषत: मुस्लीम समाजाचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या घटनांनी आता भयानक वळण घ्यायला सुरुवात केली आहे”, असं या पत्रामध्ये म्हटलं आहे.
या पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर देखील नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं हिंदुस्तान टाईम्सनं म्हटलं आहे. “सामाजिक सलोख्याला असणाऱ्या या धोक्याबाबत तुमचं मौन आम्हाला सुन्न करणारं आहे. यंदाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षपाती विचारांना बाजूला सारून या सगळ्या प्रकाराला आळा घालतील अशी आम्हाला आशा आहे”, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.



