राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाला यश ; सिल्लोडचा बायपास रस्ता होणार चकाचक
१३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्राकडून तत्वतः मान्यता
सिल्लोड (विवेक महाजन) सिल्लोड शहर हद्दीतील ६ की.मी. बायपास रस्त्याचे सुशोभीकरणासह चौपदरीकरण होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून अंदाजे १३० कोटी रुपयांच्या या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासाठी जवळपास ४ वर्ष पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.

औरंगाबाद – जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पूर्वी हा रस्ता राज्य सरकारच्या अखत्यारीत होता. त्यानंतर या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेजन करण्यात आले. या महामार्गाचा विकास साधत असतांना यातून सिल्लोड शहरातील हद्द वगळण्यात आली होती. सिल्लोडच्या बायपास चा या कामात समावेश करावा तसेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येथे देश विदेशातील पर्यटक येत असल्याने या रस्त्याचे सुशोभीकरण तसेच विद्युतीकरण व्हावे अशी मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी महामार्ग विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे.
तत्वतः मान्यता मिळालेल्या प्रस्तावानुसार सिल्लोड शहर हद्दीतील ६ किलोमीटर बायपास रस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे. या चौपदरीकरण रस्त्यातील दुभाजकात विद्युत रोषणाईने पूर्ण आकर्षक पथदिवे व विविध प्रकारच्या फुलांची झाडे लागवड करून नयनमोहक सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सोबतच या रस्त्याच्या कडेला असणारे सर्व्हिस रोड देखील या सोबत विकसित केल्या जाणार आहे.




