भारतीय अर्थव्यवस्थेत डॉ.मनमोहन सिंह यांचे योगदान विसरता येणार नाही : डॉ.निहारीका श्रीवास्तव
चोपडा (विश्वास वाडे) म.गां.शि.मंडळ संचालित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी “भारतीय अर्थव्यवस्था एक परीदृश्य”या विषयावर डॉ.निहारिका श्रीवास्तव (PBPG महाविद्यालय प्रतापगड प्रयाग राज (उत्तर प्रदेश) यांचे व्याख्यान आयोजित केलेले होते त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, डॉ.व्ही.टी. पाटील, एन.एस.कोल्हे व डॉ.के.एन. सोनवणे उपस्थित होते.
सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत असताना अर्थशास्त्र विभागप्रमुख विशाल हौसे यांनी मागील दोन वर्षात फक्त दोनच बाबीवर जास्त चर्चा झाली ती म्हणजे कोरोना आणि भारतीय अर्थव्यवस्था होय. कबचौ उमवी विद्यापीठात बी ए च्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाला आणि टी वाय बीकॉम च्या अभ्यासक्रमाला भारतीय आर्थव्यवस्था हा विषय आहे. दोन्ही अभ्यास शाखेच्या विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा लाभ मिळावा ,त्यांच्या अध्ययन कक्षा विस्ताराव्यात हा अर्थशास्त्राचा मनोदय असल्याचे स्पष्ट केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय ही हौसे यांनी करून दिला.
आपल्या व्याख्यानात डॉ.निहारिका श्रीवास्तव यांनी कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. 1990 च्या पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ही फार अडचणीत होती. सर्वक्षेत्रीय प्रगतीचा आलेख खूप नकारात्मकेत खाली घसरलेला होता. अशा काळात 1991 मध्ये अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांनी नवीन आर्थिक धोरण निर्माण करून मरगळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचं उल्लेखनीय कार्य केलेले आहे. डॉ मनमोहन सिंग यांच्या भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान विसरता येणार नाही.
भारतीय अर्थव्यवस्थेत सद्यस्थिती मध्ये भांडवल बाजाराची खूप महत्त्वाची भूमिका दिसून येत आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रात बेरोजगारी वाढेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र शेअर मार्केट मधील गुंतवणुकीची उलाढाल खूप वाढलेली आहे.निर्देशांक ६००० च्या वर गेलेला आहे हे आपल्या अर्थव्यवस्थेतील सुचिन्ह मानायला हरकत नाही. परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक व परकीय संस्थागत गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर प्रवाहित होत आहे. FDI व FII चे धोरणकर्ते ही डॉ.मनमोहन सिंगच होते.
भांडवल बाजारात गुंतवणुकीचा परतावा चांगला मिळताना दिसतोय याचा अर्थ असा नव्हे की शेअर मार्केट मध्ये लगेच मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी पैसे गुंतवले पाहिजे तर भांडवल बाजाराचा पूर्ण अभ्यास करून कोणत्या कंपनीचे शेअर खरेदी करावेत, किती होल्ड करून ठेवावेत व किती सेल करावेत याच व्यवस्थित विश्लेषण अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना करता आलं पाहिजे. त्यासाठीच आपल्या अभ्यासक्रमातील या मूलभूत संकल्पनांचा सविस्तर अभ्यास केला पाहिजे.
भांडवल बाजारात हर्षद मेहता,केतन पारीख यांच्या सारख्या व्यक्तींनी सर्वसामान्य व्यक्तीच्या भावनांचा वापर करून कृत्रिम रित्या शेअर च्या किमती वाढून करोडो रुपयांचे घोटाळे केले आहेत. अशा घोटाळ्यापासून वाचण्यासाठी अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणूनआपला या संपूर्ण प्रकियेचा अभ्यास झाला पाहिजे त्यासाठी भांडवल बाजारातील संकल्पना व त्याची व्यवहार्यता लक्षात घेतली पाहिजे असे प्रतिपादन डॉ.निहारिका श्रीवास्तव यांनी केले.
या व्याख्यानाला महाविद्यालयातील अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील विद्यार्थि मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागातील शिक्षिका आशा शिंदे यांनी केले तर आभार डॉ.जी.जे.पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या येशस्वितेसाठी आकाश मगरे, वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत देवरे,डॉ.एन.सी.पाटील व पी.ए.पुन्नासे यांनी सहकार्य केले.