सरकारने घेतला मोठा निर्णय; अखेर कोरोनाच्या ‘त्या’ चाचण्या बंद
मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहायला मिळत असताना एक मोठी बातमी समोर आलीय,राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. यातील अनेक रुग्णांना ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग होत असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता ओमिक्रॉनची स्वतंत्र चाचणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत राज्यात एकूण 797 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. मात्र, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 55 टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित असल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता यापुढे एकाही रुग्णाच्या नमुन्यांची ओमिक्रॉनसाठी जनुकीय चाचणी केली जाणार नाही. परिणाणी, यापुढे एकही रुग्ण अधिकृतपणे ओमिक्रॉनबाधित म्हणून जाहीर केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात देखील पॉझिटिव्ह रेट वाढला असून ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ओमिक्रॉन हा सौम्य आहे, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण, ओमिक्रॉनला सौम्य म्हणणं धोकादायक आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना ओमिक्रॉनबाबत सूचना दिल्या होत्या.