आम्ही काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरु करा ; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !
मुंबई (प्रतिनिधी) ओमायक्रोन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे शाळेत जाता येणार नसल्याने निराश झालेल्या सोलापुरातील एका विद्यार्थ्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. ‘आम्ही काळजी घेतो; तुम्ही शाळा सुरू ठेवा, अशी विनंती पाचवीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
कोणत्या शाळेच्या विद्यार्थ्याचे पत्र?
सोलापूर येथील केंद्रीय विद्यालय, सेंट्रल रेल्वे या शाळेत पाचवीत शिकणाऱ्या कौस्तुभ प्रभू याने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आहेत, ही व्यथा त्याने पत्रात व्यक्त केली आहे.
काय लिहिलंय पत्रात?
कौस्तुभने पत्रात लिहिलंय,
मी कौस्तुभ भूषण प्रभू इयत्ता पाचवीच्या वर्षात केंद्रीय विद्यालय सेंट्रल रेल्वे सोलापूर इथे शिकत आहे.
तुम्ही आमच्या आरोग्याच्या काळजीने शाळा प्रत्यक्ष बंद ठेवत आहात. पण ऑनलाइन शिक्षण खेडोपाड्यातील अनेक मुलांना ऑनलाइन सोयीसुविधा अभावी घेणे शक्य होत नाही.
ऑनलाइन शिक्षणामुळे गणित व विज्ञानासारखे विषय शिक्षक अनुभवी असले तरी शिकवण्याच्या मर्यादा पडतात. या विषयांचा आमचा शैक्षणिक पाया मजबूत होत नाही.
तुम्ही बोलला होता की सरसकट ठिकाणच्या शाळा आधी बंद करणार नाहीत, पण तुम्हीच आता सरसकट शाळा बंद करत आहात, तुम्ही तुमच्या निर्णयावरून असा अचानक मागे का घेत आहात. आम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन परत शाळेत येण्यास उत्सुक आहोत. तुम्ही प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे त्याने पत्रात म्हटले आहे.



