श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. ठार झालेले हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफ या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी होते. शोध मोहिमेदरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि इतर अनेक गुन्हेगारी साहित्य देखील जप्त केले आहे.

ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव इखलाक हजम असे आहे. अनंतनागच्या हसनपोरा येथे काही दिवसांअगोदरच झालेल्या एचसी अली मोहम्मद यांच्या हत्येतही त्याचा हात होता. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली कारवाई वेगाने सुरू आहे, जेणेकरून काश्मीर खोऱ्यात शांतता आणि सुव्यवस्था राखता येईल. नुकतेच गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर आतापर्यंत ४३९ दहशतवादी मारले गेले आहेत. या कालावधीत केंद्रशासित प्रदेशात ५४१ दहशतवादी घटनांची नोंद झाली आहे. तसेच, या घटनांदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. मात्र, वैयक्तिक मालमत्तेचे सुमारे ५.३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात पोलीस आणि लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईत, लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करून त्याच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला. बांदीपोरा येथील चंदरगीर हाजिन परिसरातून ही अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत त्याने स्वत:ची ओळख शब्बीर अहमद दार अशी सांगितली आहे.



