शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला लाभकारी मुल्य मिळण्याबाबतचा कायदा करावा ; भारतीय किसान संघाच्या प्रांत बैठकीत आग्रह
अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला लाभकारी मुल्य मिळण्याबाबतचा कायदा करण्याची भारतीय किसान संघाची मागणी आग्रही पद्धतीने मांडण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता जनजागरण मोहिम हाती घेतली पाहिजे. शासनाला एम.एस.पी. लागू करण्याची गरज आता लक्षात येवू लागली आहे. परंतु ख-या अर्थाने शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा करण्यास एम.एस.पी. नव्हे तर लाभकारी मुल्य हाच मार्ग योग्य असल्याचे मत येथील मंगळग्रह मंदिराच्या सभागृहात भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या बैठकीत मंथन करण्यात आले.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष बळीराम सोळंकी (माजलगाव) होते. प्रारंभी प्रदेशाध्यक्ष सोलंकी, राष्ट्रीय संघटन मंत्री दिनेश कुळकर्णी, महामंत्री मदन देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण व दिप्रज्वलन करुन बैठकिचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी अतिथींचे स्वागत कपिला मुठे, प्रा.मनोहर बडगुजर, जिल्हाध्यक्ष वैभव महाजन यांनी केले.
दि.१० जानेवारी पर्यंत याविषयी गावोगावी जनजागरण केले जाणार आहे.११ जानेवारीला देशभरात सर्व तहसिल कचेरीवर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात लाभकारी मूल्याच्या कायद्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. ११ जानेवारीच्या आंदोलनानंतर असा कायदा न केल्या किसान संघ हे आंदोलन अधिक तिव्र करेल असा देण्यात आला आहे. या बैठकित महाराष्ट्र प्रदेशात भारतीय किसान संघाच्या कार्याचे तीन वर्षांचे नियोजन करण्याचे दृष्टीने चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रांत कार्यकारणीतील संघटन मंत्री दादा लाड, चंदन पाटील, उपाध्यक्ष कपिला मुठे, रावसाहेब शहाणेपाटील, भगवानराव फुलावरे, खंडेराव कुलकर्णी, नामदेवराव बुचाले,सुभाष महाजन, प्रा.केदारनाथ कवडीवाले, महादेवराव सपकाळ, संतोष गटणे, प्रा.मनोहर बडगुजर, नाना आखरे, धनंजय गोळम आदि उपस्थित होते. पसायदानाने बैठकीचा समारोप करण्यात आला. बैठकीच्या यशस्वीतेसाठी मंत्री डॅा.दिपक पाटील, कोषाध्यक्ष श्रीकांत नेवे,सतिष पाटील, रवींद्र पाटील, ओम पाटील आदींनी परिश्रम घेतले.