‘मला प्रेमपत्र आलं आहे’ ; प्राप्तिकर विभागाच्या नोटीशीवर शरद पवारांचा टोला
मुंबई : महाराष्ट्रामध्ये नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्याच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या घडामोडी, नवीन सरकारबरोबरच केंद्रीय यंत्रणांसदंर्भात भाष्य करताना एक मोठा खुलासा केलाय. आपल्याला प्राप्तीकरासंदर्भातील नोटीस आल्याचं पवारांनी गुरुवारी स्पष्ट केलं.
“मला प्राप्तिकर विभागाकडून एक प्रेमपत्र आले आह़े २००४ साली लोकसभा निवडणूक लढवत असताना प्रतिज्ञापत्रात जी माहिती भरली होती, त्याची चौकशी आता करत आहेत,” असे पवार यांनी सांगितले. “२००९ सालीही मी लोकसभेला उभा होतो. २००९ नंतर २०१४ च्या राज्यसभा निवडणुकीला उभा राहिलो. तसेच २०२० च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्राबद्दलची नोटीसही आता आलेली आहे,” असंही पवार म्हणाले.
“इतक्या वर्षांची माहिती गोळा करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आणि तेही ठराविक लोकांची माहिती गोळा करणे, म्हणजे धोरणात्मक बदल झालेला दिसतो,” असा टोलाही पवारांनी केंद्राला लगावला.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हा आश्चर्यकारक निर्णय असल्याचे ते म्हणाले. “शिवसेनेतील ३९ आमदारांचे नेतृत्व करणारे शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिकची मागणी केली असेल. त्यामुळे भाजपा नेतृत्वाने हा निर्णय घेतला असेल, कदाचित त्याची कल्पना शिंदेंनाही नसावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले.