लागोपाठ दोन दिवसांत दोन मानाचे पुरस्कार ; विषमुक्त शेतीच्या प्रसारकार्याबद्दल नामदेव महाजन यांचा सन्मानपूर्वक सत्कार
नगरदेवळा (प्रतिनिधी) रासायनिक खते व किटकनाशकांच्या अतिवापरामुळे आजकाल अन्नधान्य, फळे, भाजीपाला खाणे हे रसायने गिळण्यासारखे झाले आहे. त्यामुळे विषमुक्त अन्न ग्रहण केले तरच आपण व आपल्या भावी पिढ्या निरोगी जीवन जगतील या गोष्टीचा पुरेपूर विश्वास पटल्याने गेल्या दहा वर्षांपासून आपल्या शेतीतील रासायनिक खते व रासायनिक किटकनाशकांच्या वापरावर पुर्णपणे बंदी घालून केवळ देशी गाईचे गोमूत्र व त्यापासून शास्रोक्त पद्धतीने निर्माण केलेले जीवामृत व घनजीवाम्रुत यांचा व आच्छादन पद्धतीचा वापर करून आपल्या शेतीतील गांडूळ व उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढवून त्याद्वारे सधन नैसर्गिक शेती करणारे व स्वखर्चाने या पद्धतीचा प्रचार प्रसार करणारे विषमुक्त नैसर्गिक शेतीचे प्रचारक नगरदेवळा(ता.पाचोरा जि.जळगाव)चे सुपुत्र नानासो. नामदेव विश्राम महाजन यांना शनिवार व रविवार,दि.१९ व २० मार्च रोजी दोन ठिकाणी दोन भव्य अशा कार्यक्रमांत सत्कार करून पुरस्क्रुत करण्यात येणार असून समस्त नगरदेवळेकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असून;संपूर्ण महाराष्ट्रातील विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकरी वर्गासाठी सुद्धा ही एक आशादायक व प्रेरक घटना आहे.

नानासो.नामदेव महाजन यांच्या ११ एकर शेतीत निंबू,केळी,मोसंबी व इतर पिके घेतली जातात. पुर्णपणे नैसर्गिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या शेतीत नामदेवनाना यांनी जलपुनर्भरणाचे सुद्धा अनेक यशस्वी प्रयोग केले असून पुर्णपणे कोरड्याठाक पडलेल्या विहीर व बोर ला आता बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. आपल्या शेतीतून नामदेवनाना हे भरघोस उत्पन्न घेत असून त्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने राज्यभरातील शेतकरी, तसेच विविध विभागांचे अधिकारी भेट देत असतात.तसेच मार्गदर्शनासाठी सुद्धा त्यांना विविध ठिकाणी आमंत्रित केले जाते. शनिवार,१९ मार्च रोजी दिव्य मराठी समूह व जैन उद्योग समूह यांच्यामार्फत जळगांव येथील समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत “क्रुषीप्रधान निष्ठा गौरव पुरस्कार” व महाराष्ट्र वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समितीचा “विषमुक्त शेतीरत्न पुरस्कार” मालेगांव येथील समारंभात आजी माजी मंत्री व आमदार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. भूमातेवरील पुर्ण विश्वास,श्रद्धा;तिच्या आरोग्याविषयी तळमळ; व समाजाची चिंता… यांमुळे नामदेवनाना यांचे व्यक्तीमत्व समस्त महाराष्ट्रात लोकप्रिय असून आता महाराष्ट्र वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समिती व जैन उद्योग समूह/दिव्य मराठी समूह यांच्याद्वारे होत असलेला सत्कार व मानाचे पुरस्कार यांबद्दल नामदेवनाना यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.




