भाजप राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याच्या प्रयत्नात ; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या हातात इथेनॉल परवाने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना या परवान्यांची लालूच दाखवून भाजप राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजाराच्या प्रयत्नात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी केला.
धनंजय महाडिक आज भाजपकडून उमेदवार आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते. महाडिक यांचा साखर कारखानदारी आणि सहकाराचा अभ्यास आहे. भाजपने राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील गडाला भगदाड पाडण्याचा कसोशीने प्रयत्न चालवलेला आहे. धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळे प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेनेतील ही लढत राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी झाली आहे. राष्ट्रवादीला स्वत: चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार संजय पवार यांना निवडून आणावे लागेल; असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक होणार, सात उमेदवार रिंगणात
भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तीन उमेदवार राज्यसभेची निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून इमरान प्रतापगढी निवडणूक लढवत आहेत. मतदान शुक्रवार १० फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.



