साक्री एसजीपी कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी
साक्री (सतीश पेंढारकर) छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य असून शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया, बहुजनांच्या सुखासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केले यासाठीची प्रेरणा त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ कडून मिळाली असे मत शिवव्याख्याते सुभाष मोहिते यांनी व्यक्त केले.

विद्या विकास मंडळाचे सी गो पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साक्री जि धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इतिहास विभाग व महाविद्यालयातील विध्यार्थी मंच आयोजित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. व्याख्यानाच्या कार्यक्रमात ‘शिवकाल व सद्यस्थिती’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. एल जी सोनवणे होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे,पर्यवेक्षक प्रा डी पी पाटील, इतिहास विभाग प्रमुख डॉ एन डी भामरे उपस्थित होते. सुभाष मोहिते बोलताना पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती,धर्म, पंथाच्या जनसामान्य लोकांना सोबत घेत अन्याय अत्याचाराविरोधात, अधर्म विरोधातसंघर्ष उभा केला. शिवकाळात शेतकऱ्यांसाठी शेतसारा माफी, विविध शेतीची उपयुक्त साधनांचे वाटप, शेतीची मोजणी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतीविषयक धोरण राबविले जात होते. खऱ्या अर्थाने त्या काळात शेतकरी राजा असल्याचे दिसून येते.शिवरायांच्या या जनकल्याणकारी कृती व विचारांचे अवलंबन समाज व व्यवस्थेने करावे हिच महाराजांना आदरांजली होय असेदेखील मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा एल जी सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर त्यांचे चरित्र व चारित्र्य अभ्यासावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत पराक्रमाची पराकाष्ठा करतमन दुर्बल न होऊ देता स्वराज्य स्थापन केलेअसे देखील प्रतिपादन त्यांनी प्रसंगी केले.प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणांना आदर्श मानून, त्यांनी घालून दिलेल्या शिस्तीचे पाईक विद्यार्थ्यांनी व्हावे असे मत व्यक्त केले.शिवजन्मोत्सव निमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ” छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आजचा युवक” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा व ” राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय एक अनुबंध” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय आयोजक डॉ एन डी भामरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा ज्योती जाधव यांनी तर आभार कु शितल सोनवणे हिने केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी बांधव व विद्यार्थी उपस्थित होते.



