महावितरणचे जिल्ह्यात तालुकास्तरावर वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन
३१ मार्च पर्यंतच ६६ टक्के सवलतीची संधी
अमरावती (प्रतिनिधी) कृषी वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजबिलांबाबत असणाऱ्या शंका आणि तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे दिनांक १४ ते २३ मार्च दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वीजबिल दुरुस्ती शिबिराचेआयोजन करण्यात येत आहे.
महावितरणकडून आयोजित या शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मिटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. कृषी ग्राहकांच्या वीज देयक दुरुस्ती व मंजूरीचे प्रस्ताव महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करुन देयक दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येणार आहे.
तालुकास्तरावर आयोजित या शिबिरामध्ये १४ मार्चला चिखलदरा,१५ मार्चला अचलपूर,धारणी,अमरावती आणि नांदगाव खंडेश्वरला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.१६ मार्चला भातकूली व दर्यापूरला ,तर १७ मार्चला अचलपूर,धामणगाव रेल्वे आणि चांदूर बाजार तालुक्यात मेळाव्याचे आयोजन केले आहे.२१ मार्चला मोर्शी,२२ मार्चला चांदूर रेल्वे आणि २३ मार्चला तीवसा आणि वरूड तालुक्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील महावितरणच्या एकूण थकबाकीपैकी सप्टेंबर २०२० अखेर कृषी ग्राहकांकडे रु. ४५,८०२ कोटी थकबाकी झालेली आहे. त्यामुळे कृषी ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व समावेश “कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२०” जाहीर केले होते. या धोरणा अंतर्गत निर्लेखनाद्वारे रु. १०,४२० कोटी सूट, व्याज व विलंब आकारामध्ये रु. ४,६७६ कोटी सूट दिल्यानंतर सुधारीत थकबाकी रु. ३०,७०६ कोटी निर्धारित करण्यात आली आहे. त्यापैकी फक्त रु.२,३७८ कोटी रक्कमेचा भरणा कृषी ग्राहकांद्वारे करण्यात आलेला आहे. सप्टेंबर २०२० पासून चालू वीज देयकाच्या थकबाकीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आज रोजी एकूण थकबाकी रु. ३९,९९३ कोटी झाली आहे.
महावितरणच्या कृषी धोरणानुसार मिळणाऱ्या ६६ टक्के सवलतीची मुदत ३१ मार्च २०२२ ला संपत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व थकबाकीदार ग्राहकांना या धोरणात असलेल्या भरघोस सवलतीचा लाभ ३१ मार्चपुर्वी घेऊन थकबाकीमुक्त व्हावे असे आवाहन आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.



