ग्रामीण भागातील जनतेसाठी प्राधान्याने आरोग्याच्या सुविधा पुरविणार ; आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे
जिल्हा परिषद सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांचे कार्याचा ना.राजेश टोपे,माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचेकडून गौरव
चोपडा (विश्वास वाडे) राज्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील पुढाकार घ्यावा, आदिवासी पट्ट्यात व ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. शासनाच्या नियमा प्रमाणे काही महत्वाच्या आरोग्य सुविधा ह्या उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात देण्यात येतात. परंतू उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळणेसाठी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून शासनाकडे प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करून ग्रामीण भागातील जनतेसाठी प्राधान्याने आरोग्याच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांनी दिले.
चहार्डी-बुधगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या प्रा.डॉ. निलम शशिकांत पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या साडेचार कोटीच्या चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन प्रशस्त इमारतीचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्याहस्ते दि.२० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाइन उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या उच्च विद्या विभूषीत जिल्हा परिषद सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील विरोधी पक्षाच्या असतांना त्यांनी संघर्ष करून मतदार संघाच्या विकासकामांसाठी निधी खेचून आणला. माणूस शिक्षित असला तर काय करू शकतो याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रा.डॉ.निलम पाटील यांचे कार्य निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार ना.राजेश टोपे यांनी यावेळी बोलतांना काढले. जळगाव येथील शासकीय रुग्णालयात डायबेटीक, हृदय विकार व कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर औषधोपचार व्हावा यासाठी एमआर आय, सिटीस्कॅन आदी सुविधा मिळणेसाठी निधी उपलब्ध करून आरोग्य विभागातील ५५० रिक्त जागा भरणेसाठी ग्रामीण विकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचेशी बोलणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना ना.राजेश टोपे यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्अरुणभाई गुजराथी म्हणाले की, अर्थ संकल्पात आरोग्य व शिक्षणासाठी भरीव निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. कारण शिक्षण मिळाले तर आरोग्याची जागृती आपोआप होईल. जिल्हा परिषदेत विकासासाठी निधी कमी येतो मात्र विरोधी पक्षात राहून प्रा.डॉ.निलम पाटील यांनी साडेचार कोटीचा निधी आणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करून गोरगरीब जनतेसाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात. सभागृहात सत्ताधाऱ्यांना विरोध करणे विरोधी पक्षाचे काम असते तर विरोध वैयक्तिक नसतो असे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या प्रसंगी एकनाथराव खडसे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात आदिवासी व ग्रामीण भागात आरोग्या च्या सुविधा खूपच कमी आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात एमआरआय, सिटीस्कॅन, डिजीटल एक्सरे मशीन सारख्या आदी सुविधांसाठी निधीची गरज असून, कर्मचारी कमी असल्याने जनतेला सुविधा मिळत नाही. प्रा.डॉ. निलम पाटील यांनी जिल्हा परिषदेत संघर्षाची भूमिका घेऊन मतदार संघात विकासाची कामे केली. चहार्डी सारख्या गावात साडेचार कोटीचे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असून काही ठराविक लोकप्रतिनिधींनी पंधरा वित्त आयोगाचा २४ कोटी निधी आपसात वाटून घेतला. सर्व सदस्यांना समान निधीचे वाटप व्हावे म्हणून प्रा.डॉ. निलम पाटील यांनी आवाज उठवून थेट उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व ना.हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन २४ कोटी निधीच्या खर्चाला स्थगिती आणून मनमानीला आळा घातला.त्या एक सक्षम व जागृत लोकप्रतिनिधी असून, अशा लोकप्रितिनिधींना सरकारने पाठबळ दिले पाहिजे, असे गौरवोद्गार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काढले.
यावेळी आ.शिरीष चौधरी म्हणाले, जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असून,न्यायिक भूमिका घेतली पाहिजे. आज तुमची सत्ता आहे उद्या आमची सत्ता येईल. प्रा.डॉ.निलम पाटील आमच्या संस्थेत प्राध्यापक असून, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अड.रवींद्र पाटील व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात प्रा.डॉ.निलम पाटील यांनी चहार्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात डिजीटल एक्सरे व ईसीजी मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमचे नेते अरुणभाई गुजराथी व आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षात मतदार संघात जास्तीत जास्त विकासाची कामे करून शेतकऱ्यांसाठी शेत रस्ते,कोविड संसर्ग रोखण्यासाठी चहार्डीत तीन हजार लसीकरणाचा कॅम्प घेतला. पाणी अडविण्यासाठी बंधारे, सहा प्राथमिक शाळांना सौर पॅनल देऊन डिजीटल शाळा केल्या. साडेचार कोटी पेक्षा जास्त निधी आणून सर्व सुविधायुक्त प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण करून एकोणावीस गावातील नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार प्रा.दिलीपराव सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र पाटील, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, संचालक नेमीचंद जैन, जिल्हा दूध संघाचे संचालक ए.डी.चौधरी, गटनेते जीवन चौधरी, चोसाकाचे चेअरमन अतुल ठाकरे, संचालक निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, चहार्डीचे उपसरपंच तुळशीराम उर्फ पिंटू कोळी, बाजार समितीचे सभापती दिनकरराव देशमुख, माजी सभापती जगन्नाथ दामू पाटील, गिरीष पाटील, कांतीलाल पाटील, माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, जिल्हा बँकेच्या माजी व्हॉ.चेअरमन इंदिराताई पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव रायसिंग, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील, पंचायत समिती सभापती कल्पना दिनेश पाटील, उपसभापती सुर्यकांत खैरनार, माजी सभापती मालुबाई कोळी, सनपूले येथील यशवंत पाटील, माजी सरपंच उषाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य सिंधुताई चौधरी, एनआरएचएमचे हरीश पवार, शाखा अभियंता विजय शिंदे,टेली मेडिसीनचे नितीन राठोड,अतिरिक्त जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. प्रमोद पांढरे,गटविकास अधिकारी बी.एस. कोसोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र पाटील, डॉ.जाधव, डॉ.अतुल पाटील कंत्राटदार एसकुमार कन्स्ट्रक्शन अमळनेर यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रहास गुजराथी यांनी केले तर पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी आभार मानलेत.कार्यक्रमाला चहार्डी व परिसरातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शशिकांत पाटील, दत्तात्रय उर्फ पिंटू पाटील,दत्त डेअरीचे चेअरमन जगदीश पाटील,ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कोळी गणेश पाटील,दिनकर पाटील,ज्ञानेश्वर पाटील, किरण मोरे,मयूर उर्फ गोलू पाटील,उल्हास पाटील भगवान पाटील, नितीन पाटील,सुनील पाटील, चैतन्य पाटील, हिमांशू पाटील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतलेत.
