हिंदुत्वाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांवर रावसाहेब दानवेंचा निशाणा
मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांना फटकारलं. यावरुन भाजपकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्यातल्या जनतेला कोणताही दिलासा न देता त्यांनी केवळ भाजपावर तोंडसुख घेण्याचे काम केलं असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.
राज्यातल्या जनतेला या सभेबद्दल उत्सुकता होती. मुख्यमंत्री राज्याला उद्देषून काही बोलणार म्हणून सर्वजण टिव्हीकडे डोळे लावून बसले होते. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकल्यानंतर सर्वांची निराशा झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून आम्ही काय करतो आहोत, आम्ही काय करणार आहोत आणि राज्याची सध्याची स्थिती काय आहे अशा प्रकारची वक्तव्ये यायला हवी होती. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून आम्ही राज्यातील जनतेसाठी काय करणार आहोत, काय केलं आहे याबद्दल बोलणं अपेक्षित होतं पण ते विकासाच्या मुद्द्यावर बोलले नाहीत. पण विकासाची चर्चा न करता, राज्यातल्या जनतेला कोणताही दिलासा न देता त्यांनी केवळ भाजपावर तोंडसुख घेण्याचे काम केलं असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.
तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आणि आम्हाला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, पण बाळासाहेबांना कधी आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं बोलायची वेळ आली नाही, असा टोला दानवे यांना मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.



