महाराष्ट्र

महा आवास अभियानातून 5 लाख बेघरांना चालू आर्थिक वर्षात मिळणार घरे ; ग्रामविकास विभागाचा निर्धार

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन

पुणे ( प्रतिनिधी ) दि.23, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महा आवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता दुसऱ्या टप्प्यात ५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा निर्धार राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.

‘महा आवास अभियान २.०’ चा राज्यस्तरीय शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मंत्रालयातून करण्यात आला. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे), ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातून विभागीय आयुक्त सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त (विकास) विजय मुळीक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील विभागीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त, उपायुक्त (विकास), जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी व तसेच ग्रामसेवक उपस्थित होते.

बेघर व्यक्तींना घरे देण्यात येणाऱ्या अडचणी शासन स्तरावर तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.

घरासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाच्या सहकार्याने मार्ग काढला जाईल. गरजूंना घरे मंजूर करताना नियमांचा अडथळा असल्यास नियम शिथील करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करू, अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसेच ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार देऊन प्रोत्साहीत करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम शासनाचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत घरे बांधून गरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण करावे अशा सूचना देत ग्रामस्तरावर येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन नियोजन केल्यास अभियान अधिक यशस्वी होईल असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
——————————————–
महाआवास अभियान २.० २० नोव्हेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत असून हे अभियान अधिक गतिमानतेने आणि गुणवत्तेने राबविण्यात येणार आहे. अभियानादरम्यान अपूर्ण असलेली घरे पूर्ण करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गांभिर्याने प्रयत्न करावे. घरकूल बांधण्याचा कालावधी कमी करण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याप्रसंगी केले.
———————————————–
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात विविध ग्रामीण आवास योजनांमधून बेघरांना सर्व सुविधांनी युक्त असा हक्काचा निवारा पुरविण्यात यश येत आहे. याचाच भाग म्हणून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राबविलेल्या महा आवास अभियान-ग्रामीण (टप्पा-१) मध्ये १२६० पेक्षा जास्त बहुमजली इमारती, ६३० पेक्षा जास्त गृहसंकुले तसेच ७५० घरकुल मार्ट सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर ५० हजार ११२ भूमीहीन लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. टप्पा-१ मध्ये ४ लाख २५ हजार घरकुले भौतिकदृष्ट्या बांधून पूर्ण केली असून उर्वरित घरकुले तात्काळ पूर्ण करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे