एसटीचा संप मिटविण्याबाबत नंदुरबार प्रवासी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना साकडे
नंदुरबार (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून संप पुकारला असून एसटीचा संप मिटविण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका शाखेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी ई-मेल द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन पाठवले. या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे कुटुंबप्रमुख आणि कारभारी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रवासी जनतेच्या हाल-अपेष्टा थांबवाव्यात. याचबरोबर राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावी लेखी परीक्षा दिनांक 4 आणि 15 मार्च पासून सुरु होत आहेत. सर्वांचे लक्ष एसटीच्या संपकरी कर्मचारी आणि राज्य शासन यांच्याकडे आहे. तसेच ते विद्यार्थी वर्गाकडे असावे आणि त्यांचा परीक्षा केंद्रापर्यंत नियोजित वेळेत पोहोचण्याचा मार्ग सुकर व्हावा अशीच अपेक्षा ग्रामीण भागातील लक्षावधी विद्यार्थ्यां सह पालकांची आहे. याची राज्य शासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुका शाखेतर्फे करण्यात आली आहे. ऐन लग्नसराईच्या हंगामात एसटी महामंडळाच्या संपाचा फायदा घेत अनेक खाजगी वाहन चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची पिळवणूक करीत आहेत. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरु असलेल्या संपाची शुक्रवारी सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एसटीच्या इतिहासात आजवरचा हा सर्वाधिक काळ चाललेला संप असल्याचे निदर्शनास येत आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्याने लक्ष देऊन एसटी महामंडळाच्या संपावर तोडगा काढावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे, संघटक योगेश्वर जळगावकर, सदस्य डॉ. गणेश ढोले, ॲड. निलेश देसाई, नितीन पाटील, दर्शन ठक्कर, वैभव करवंदकर, रघुनाथ अहिरे, भरत माळी, अशोक यादबोले, संभाजी पाटील,बी.डी. गोसावी, अनिल बरे, शैलेश जाधव,प्रा. गीता जाधव, अबोली चंद्रात्रे, पूनम भावसार आदी सदस्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.